Monday, 31 October 2016

दिवा तुमच्या मनातला...

फ्रेंड्‌स, हल्ली आपण इतके बिझी असतो की आपल्याला मॅसेज फॉरवर्ड करायलाही वेळ मिळत नाही. सोशल मीडियावर थोडंसं मित्रांशी हाय, हॅलो करतो तेवढंच; पण त्या पलीकडे काहीच करता येत नाही. घरच्यांशी किंवा जवळच्या मित्रांशी ग्रुपवरच मॅसेज, कमेंट करत बोलणं होतं. कॉलेज आणि क्‍लासचा अभ्यास, नव्यानं जॉईन केलेल्या ऑफिसमधल्या जबाबदाऱ्या, टेन्शन यामुळे मित्रांना आणि घरच्यांनाही वेळ देता येत नाही. पण नाराज व्हायचं नाही, उत्सव येतोय... मनात निराशेचा अंधार नका दाटू देऊ...दिवा तुमच्या मनात आहेच, तो प्रकाशमान ठेवा...

घरच्यांसाठी वेळ देणं 
घरच्यांसाठी वेळ देणं ही गोष्ट ए एस एपी झालेली आहे. आपल्या आई-वडिलांसाठी, नातेवाइकांसाठी आठवड्यातून काही वेळ राखून ठेवा. घरच्यांसोबत फिरायला जा किंवा एखादं फॅमिली फंक्‍शन अटेंड करा. वाटल्यास नातेवाईकांना फोन करून तुमच्याच घरी कट्‌टा टाकण्यासाठी बोलवा.

गावाला भेट द्या
शहरातल्या गडबडीत आपण गावाकडच्या आठवणींचं मोरपीस जपत असतो. कधी जायला मिळेल, याचे प्लान्सही बनवत असतो; पण जाणं काही होत नाही. गावाकडचे मोबाईलमध्ये असलेले पिक्‍स बघून हळहळत असतो. एखादा गावचा मित्र गावाकडचे हॅपनिंग्ज सांगून तुमचा इगरनेस वाढवत असतो, तर जास्त विचार करीत बसू नका. पटकन बॅग पॅक करा आणि आपल्या गावी एक दिवस का होईना भेट देऊन या.

मित्रांबरोबर ट्रॅव्हलिंग 
महिन्याभरातून एकदा सगळ्या मित्रांनी एकमेकांना ग्रुपवर मॅसेज करून एखादं हटके डेस्टिनेशन शोधा आणि सर्वांनी मिळून मनसोक्त भटका.

स्वप्नांचा पाठलाग करा
नेहमीच्या शेड्युलमध्ये बिझी असलात तरी स्वप्नं पाहणं सोडू नका. स्वप्नं आपल्याला रोज एखादा गोल सेट करण्यासाठी एनर्जी देत असतात. त्यामुळे स्वप्नं तर पाहायला हवीच आणि पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवत ते पूर्ण होण्यासाठी प्रयत्नही केले पाहिजेत.  

नवीन काहीतरी शिका  
रोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. हे फारसं कठीण नाही. रोज स्वतःच मी ही गोष्ट करणार असं ठरवा उदाहरणार्थ रांगोळी काढणं, पेटिंग करणं, लिहिणं, गार्डनिंग अशी कुठलीही एखादी गोष्ट करायची असं ठरवा आणि जस्ट गो फॉर इट.

स्वतःलाच चॅलेंज करा 
आपणच आपल्याला रोज चॅलेंज करीत रहायचं. असं एखादं काम किंवा असा एखादा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करता येत नसेल, तर त्याला आव्हान म्हणून स्वीकारा. त्यात यशस्वी होण्यासाठी स्वतःला झोकून द्या.

काळजी करणं सोडून द्या 
छोट्या छोट्या गोष्टींची काळजी करणं सोडून द्या. कारण काळजी करीत बसलो की, आपला कामावरचा सर्व फोकस निघून जातो. एखादा विषय किंवा घटना तुम्हाला सतावत असेल, तर घरातील मोठ्यांशी चर्चा करून तो सोडवा. आतल्या आत ठेवून कुढत बसू नका. काही प्रश्‍न थेट बोलण्यानं नक्कीच सुटतील.

सोशल व्हा 
लोकांमध्ये मिसळा, एखादा विषय घेऊन त्यावर चर्चा करा. सोशल मीडियावर आपण सामाजिक गोष्टी आणि घडामोडींवर व्यक्त होतच असतो; पण एखादा ग्रुप जमवून चर्चा करणं किंवा इतरांची मतं जाणून घेणं हे सगळ्यात बेस्ट नाही का

मनमोकळं हसा
मनमोकळं हसायलाही हल्ली आपल्याला कारणं शोधावी लागतात. नाही तर मॅड आहे का रे हा? असं उगाच कुणी बोलायला नको; पण लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. एखादी विनोदी सीरियल बघा, मूव्ही बघा किंवा तुमच्या आवडीच्या काही हॉबिजमध्ये मन गुंतवा. मग बघा तुमच्या चेहऱ्यावर किती छान स्माईल येईल.

प्रेमात पडा
आणि हो... ही शेवटची पण महत्त्वाची गोष्ट. प्रेमात पडा, खरंच हे वयच आहे तुमचं प्रेमात पडायचं. तुमच्या वयाच्या अनोळखी मुला-मुलींशी छान मैत्री करा. एकमेकांचे विचार छान जुळले, असं वाटत असेल तर पुढची पायरी गाठायला काहीच हरकत नाही; पण रिलेशनशिप्स नेहमी एकमेकांना स्पेस द्या. आपले ऑफिसमधले कलीग्ज, कॉलेजमधले मित्र-मैत्रिणी आणि आपले नातेवाईक यांना प्रेमानं, मैत्रीच्या नात्यानं आपलंसं करा. 

(पूर्वप्रसिध्दी- सकाळ मुंबई आवृत्ती)




Saturday, 1 October 2016

तोंड उघडण्याआधी, मनाचं दार उघडा...(Smell It, Feel It & Have It)

एका CCD मध्ये दोन मित्र कॉफी पित होते. त्यातला एक दुसऱ्याला म्हणाला, काय यार आज काहीतरी वेगळं ट्राय करु या म्हटलं, तर तू नेहमीप्रमाणे ही काळी कॉफी मागवलीस. अरे ए, काळी कॉफी काय? हिला Espresso म्हणतात. या कॉफीचा मग असा उचलायचा, तिचा स्मेल घ्यायचा, फिल करायचं आणि मग ही कॉफी प्यायची असते. जाऊ दे, तुला नाही कळणार!” “पुढच्या वेळेस आपल्या नेहमीच्या कट्ट्यावर जाऊ या कटींग प्यायला.”
मित्रांनो, या संवादामधून हे सांगायचं आहे की कुणाला CCD मध्ये ब्रँडेड कॉफी पिताना फिल येतो, तर कुणाला कट्ट्यावरचा चहा पिताना फिल येतो. म्हणजेच एखादा पदार्थ (पाककृती) हा मनानं खाल्ला आणि प्यायला जातो. त्यानंतर त्याचा तोंड उघडून आस्वाद घ्यायचा असतो.
तोंड उघडण्याआधी मनाचं दार उघडा! हे वाक्य खाद्यसंस्कृतीच्या दृष्टिने फार महत्त्वाचं आहे. कारण मनाचं दार उघडणं. ही खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यातली पहिली पायरी आहे. ही पायरी आपण अलिकडे मिस करतोय. आईने आपल्या मुलांसाठी केलेला स्वयंपाक, बाबांनी आपल्या मुलांसाठी केलेला ब्रेकफास्ट, नव्या नवरीने आपल्या सासरी आल्यावर केलेला पहिला स्वयंपाक, नवऱ्याने बायकोसाठी आणि बायकोने नवऱ्यासाठी प्रेमाने केलेला स्वयंपाक, मित्रांनी एकत्र जमून कल्ला करत बनवलेली एखादी ऑफ बीट रेसिपी किंवा यू ट्यूब वर बघून स्वतःच स्वतःसाठी बनवलेली एखादी नवी रेसिपी, यातली गंमत, प्रेम आणि तो पदार्थ बनवताना होणारा आनंद आपण फिल करायला, हल्ली विसरतोय. त्यानंतर त्या पदार्थाला चांगली दाद मिळाली. आपलं कौतुक झालं. की अजून चार चाँद लागतात. पण आपल्याकडे आता एवढा वेळ कुठेय? ते फिल करायला. ९ ची ट्रेन पकडायची आहे, आज ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन आहे, लिखाणाचं खूप काम आहे, R&D करायचायं...ही सगळी कामं करता करता अक्षरशः आपण खाणं तोंडात कोंबतो आणि कामाला पळत सुटतो किंवा तो पदार्थ हातात घेऊन खात खातच आपण चालू लागतो. शुटींगला जाणारी मंडळी गाडीतच नाश्ता करतात. तर कुणाच्या कामाच्या रात्रीच्या शिफ्ट असल्या की आपलं आहारशास्त्रच बिघडून जातं.
जागतिक पातळीवरील आहारतज्ज्ञ थिंक ग्लोबल अँड इट लोकल असा सल्ला देत असताना आपल्या प्रत्येकावर ही जबाबदारी आहे की आपल्या पारंपरिक पाककृतींचा वारसा आपण जपला पाहिजे आणि तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे. मग हे आपल्या हातून कधी घडणार?
म्हणूनच मित्रांनो, आठवड्यातून एकदा आपल्या घरातील आजी-आजोबांसोबत खाद्यपदार्थांविषयी गप्पा मारा किंवा आई-बाबांसोबत बसून एखाद्या पाककृतीवर चर्चा करा. किंवा गावाकडे राहणाऱ्या आपल्या ओळखीतील कुणालातरी फोन करा आणि त्यांच्याकडून त्यांच्या बालपणी बनवल्या जाणाऱ्या पदार्थांविषयी त्यांना बोलतं करा.
या संवादातून तुमच्या माहितीच्या कोशात ५-६ नव्या रेसिपींची भर पडेल. कधी कधी सुट्टीच्या दिवशी, सणांच्या दिवशी कुटुंबातील सगळ्यांनी एकत्र मिळून स्वयंपाक करा. त्यातून एकमेकांच्या किचन टिप्स तुम्हाला कळतील. आपल्या कुटुंबासोबत बनवलेल्या पाककृतींची आणि आपल्याला नव्याने कळलेल्या पाककृतींची तुमच्या डायरीत नोंद करा किंवा त्या रेसिपीचे फोटो काढून ठेवा. महिन्यातून ३-४ अशा पाककृतींची नोंद तुम्ही ठेवलीत तर तुमच्याकडे वर्षभरात तिसेक पाककृतींचा खजिना तयार होईल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठेही गेलात किंवा घरी नेहमीचं जेवण जेवत असाल तर पदार्थ चांगला झाल्याबद्दल त्या व्यक्तिचं कौतुक करा. पदार्थ बनवण्यात एखादी उणीव राहिली असेल तर प्रेमळ शब्दात त्या व्यक्तिला समजून सांगा. एखाद्याने आपल्यासाठी स्वयंपाक केलाय किंवा नवी रेसिपी बनवलीय तर त्या गोष्टीला आधी फिल करा. मग त्यावर यथेच्छ ताव मारा. आणि एक लक्षात घ्या की कुठलीही रेसिपी कठीण किंवा सोपी आणि बरी किंवा वाईट नसते. रेसिपी ही रेसिपी असते ती बिघडली तर आपलं शरीराचं काय करेल, हे आपल्याला चांगलच ठाऊक आहे. त्यामुळे तुला एवढी साधी रेसिपी बनवता येत नाही किंवा कशी बनवायची माहित नाही असं म्हणून कुणाचं मन दुखवू नका. म्हणूनच आम्ही म्हणतोय की तोंड उघडण्याआधी मनाचं दार उघडा.
नवरात्रौत्सव सुरू झालाय. सर्वांच्या घरी त्याचीच लगबग सुरू असेल. आणि नऊ दिवसात कुठले पदार्थ करायचे? याचा विचार गृहिणी करत असतील. त्यांची मदत करा. त्यानंतर दिवाळी येईल. आपल्या मालवणी मुलखाचं फार कौतुक वाटतं. आपल्याला गणपतीला गावी जायचं तिकीट मिळालं की गोल्ड मेडल मिळाल्याचा आनंद होतो. हा आनंद असाच टिकवून ठेवा. वेगवेगळ्या पारंपरिक सणांच्या माध्यमातून सणासुदीचा आनंद मालवणी मुलखात वर्षभर साजरा होतो. यापुढेही ही परंपरा अशीच टिकून रहावी.
आता संपूर्ण भारतभराविषयी सांगायचं तर मित्रांनो, वर्षाच्या १२ महिने आपण वेगवेगळे सण, समारंभ साजरे करत असतो. त्यात आपण मनाने किती असतो? हा भाग वेगळा. पण सणांचं हे सेलिब्रेशन बघताना कधी कधी वाटतं, सगळा दिखावा आहे. आतून कोणी खुशच नाहीय. काही ना काही आपण मिस करतोय. ते नेमकं काय मिस करतोय? हे आपापल्या पातळीवर प्रत्येकाने त्याचा शोध घ्या. लाऊडस्पीकरच्या आवाजात आपल्या मनाचा आवाज हरवू देऊ नका.
या सोशल मीडियामुळे आपण प्रत्येकाला छोट्या मोठ्या सणांच्या शुभेच्छा देणं, हे काम आहे, असं समजून ते फॉरमॅलिटी म्हणून करतो. या ब्लॉगच्या आणि परबांचो पावनेर या पेज च्या माध्यमातून सणांच्या अशा प्रकारे कोरड्या शुभेच्छा देण्यापेक्षा काहीतरी नवा विचार द्यावा आणि हार्ट टू हार्ट संवाद साधावा यासाठी हा लेखन प्रपंच. आपलं हे पेज पाककृतींविषयी आहे, सण कसे साजरे करावेत? हे सांगण्यासाठी नाही. तरीपण एक वेगळा दृष्टिकोन द्यायला काय हरकत आहे, नाही का?  सो, आजपासून एखादा पदार्थ खायला सुरुवात करण्याआधी त्याला फिल करा. मग खा. एखादी नवी रेसिपी शिकलात किंवा तिच्याविषयी माहिती मिळाली तर त्याची नोंद तुमच्या डायरीत करा...फोटोसुध्दा काढा... आणि तोंड उघडण्याआधी मनाचं दार उघडा हे वाक्य नक्की लक्षात ठेवा...Smell It, Feel It & Have It!!!!!


(मालवणी खाद्यसंस्कृतीविषयी अधिक जाणून घेण्यासाठी परबांचो पावनेर या फेसबुक पेज ला भेट द्या.)

Saturday, 17 September 2016

घावन्यांची गोष्ट

दोन इले पावने, चार केले घावने असं गुणगुणत मालवणी गृहिणी पटकन घावने करायला चुलीजवळ बसते. पण घावन्यांच्या या पाककृतीची गोष्ट खूप मजेशीर आहे.
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका आटपाट नगरात एका राजाचं राज्य होतं. राजाला कला, संस्कृतीची खूप आवड होती. त्याचबरोबर हा राजा एक उत्तम खवय्या होता. वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणं, त्याला खूप आवडायचं. राजाच्या राजमहालात रोजचा स्वयंपाक आणि त्याचबरोबर रोज नानाविध पक्वान्नं बनवण्यासाठी १०-१२ आचारी (बल्लवाचार्य) होते. एके दिवशी राजाच्या मनात आलं आणि त्याने सर्व बल्लवाचार्यांना बोलावलं. त्यांना सांगितलं की तुम्ही केलेला स्वयंपाक मी रोज चवीनं खातो. पण आज मला एक वेगळाच खाद्यपदार्थ हवा आहे, जो पटकन बनणारा असेल, साधा, सोपा असेल, पटकन पोट भरणारा असेल, अगदी कमी सामुग्री आणि आपल्या राज्यात उपलब्ध असलेल्या धान्यातूनच बनेल, तो खाद्यपदार्थ दिसायलाही नावीन्यपूर्ण असेल...
राजाच्या बोलण्याने सगळे पाककुशल आचारी विचारात पडले, त्यांना काही असा पदार्थ सापडेना... त्यांनी राजासमोर हार मानली. मग राजाने राज्यात प्रधानाकरवी दवंडी पिटवली. जो कोणी असा नावीण्यपूर्ण पदार्थ राजासमोर सादर करेल. त्याला योग्य तो इनाम दिला जाईल...
राज्यातील सगळी मंडळी कामाला लागली. सगळ्यांनी आपापल्यापरीने खाद्यपदार्थ बनवले आणि दिवसभरात एकेक करून राजासमोर सादर केले, पण राजाला काही पसंत पडेनात. अखेर संध्याकाळ होता होता एक आजीबाई हातात एक ताट घेऊन आल्या. राजासमोर त्या ताटावरचं झाकणं उघडलं आणि त्यांचा पदार्थ दाखवला...तो पदार्थ होता घावने...
राजा ते ताटभर घावने पाहून चकीत झाला. त्याने पदार्थाची चव पाहिली. त्याला ती आवडली. घावन्याचा गोल आकार आणि खास करून घावन्यावर असलेले सारख्या आकाराचे ठिपके लक्ष वेधून घेत होते. राजा म्हणाला, मला हा खाद्यपदार्थ आवडला. पण आजीबाई मला एक सांगा, या घावन्यावर तुम्ही ठिपके कसे पाडलेत... यावर आजीबाई हसून म्हणाल्या. घावन्यामध्ये पीठ, मीठ आणि पाणी मिसळलेलं असतं. हे मिश्रण बीडं नावाच्या जाड बुडाच्या तव्यावर पसरलं जातं. हे मिश्रण पसरण्याआधी बिडाच्या तव्यावर तेल सोडून त्यानंतर केळीच्या पानाच्या देठाने किंवा कांद्याच्या चकतीने ते तेल त्या बिडाच्या तव्यावर नीट पसरवायचं. मग त्यावर हे मिश्रण घालायचं की आपोआप त्या पिठाला अशी ठिपक्याची जाळी पडते. ती दिसतानाही छान दिसते...
आजीबाईंचं हे स्पष्टीकरण ऐकून राजा थक्क झाला. त्याने आजीबाईंना हजार सुवर्णमुद्रा दिल्या. आणि त्यांचा सन्मान केला.
अशी एक घावन्यांची जन्मकथा मला आईने आणि आजीने सांगितली होती. तर मंडळी या गोष्टीवरून लक्षात आलंच असेल हे घावने म्हणजे किती सुंदर, सोपी पाककृती आहे ते! हे घावने करताना ते सुरय भाताचे केले जातात.
मालवणी मुलखात खास करून वालय आणि बेळा या प्रकारचा पारंपरिक भात पिकतो. भात पिकाच्या इतर सुधारित आणि संकरित जातीही आहेत. त्याचे उकडे तांदूळ आणि सुरय तांदूळ केले जातात. उकडे तांदूळ म्हणजे भात (भाताचे गोटे) उकडून ते सुकवलं जातं त्यानंतर ते गिरणीतून सडून आणलं जातं, त्याला उकडे तांदूळ म्हणतात.
तर सुरय तांदूळ म्हणजे भात (भाताचे गोटे) न उकडता तसेच गिरणीतून सडून आणले जाते.
याच सुरय तांदळाच्या पिठाचे घावने केले जातात. आपण शहरी भागात राहत असू तर आपण रोजच्या जेवणातील भात करण्यासाठी जे तांदूळ वापरतो, ते वापरले तरी चालेल.

हे सुरय तांदूळ साफ करून करून स्वच्छ धुवून रोवळीत निथळत ठेवले जातात. त्यानंतर रोवळीतून काढून ते एका स्वच्छ कपड्यावर पसरून घातले जातात. हे पसरवलेले तांदूळ नीट सुकले की त्याची जात्यावर पिठी दळली जाते. त्यानंतर हे पिठ चाळणीने चाळून मग ते पिठ घावने करायला घेतलं जातं. मालवणी मुलखात तवशाचे घावने, सातकप्याचे घावने आणि साधे घावने असे तीन प्रकारे घावने केले जातात. अधिक माहितीसाठी आणि मालवणी पाककृतींसाठी खालील परबांचो पावनेर या फेसबुक पेज ची लिंक बघा.

https://www.facebook.com/malvanicuisine/


सुरय तांदळाच्या पिठाचे घावने, फोटो-हर्षदा परब

फणसाच्या भाजीविषयीची एक आठवण

भूतकाळात घडून गेलेल्या चांगल्या आणि आनंद देणाऱ्या गोष्टी नेहमी आठवाव्यात. त्यामुळे पुन्हा एकदा तो क्षण आपल्यासमोर जिवंत होतो आणि आपल्याला पुनःप्रत्ययाचा आनंद देतो. बालपणात घडलेले असे कित्येक घटना-प्रसंग दिवसभरातील कामाच्या व्यापात आपल्याला आठवले की आपल्या चेहऱ्यावर हसू फुटतं. भूतकाळातील अशाच सुंदर आठवणींपैकी ही एक आठवण...
गणोबा गणोबा, कुठे गेला होतास?
कोकणात
कोकणातून काय आणलंस?
फणस...
नीटसं, काही आठवत नाही, पण अशा काहीशा शब्दातला संवाद बालपणी कानावर पडला होता. सांगायचा मुद्दा हा, कोकण म्हटलं की फणस या फळाची रेलचेल. यासाठी वेगळे पुरावे द्यायला लागत नाहीत.
आमच्या गावच्या घरी बरीच वर्ष आमचं हक्काचं असं फणसाचं झाड नव्हतं. त्यामुळे खूप वाईट वाटायचं. मग आम्ही ६-७ वर्षांचे असताना आईने फणसाची ७-८ झाडं लावली. त्यातली ६ झाडं आता खूप मोठी झालीत. आणि मोठाले फणसही झाडांवर दिसू लागले. ज्या दिवशी पहिला फणस आम्ही भावंडांनी झाडावर पाहिला, तेव्हा प्रचंड खूश झालो होतो...
पण त्याआधी आमच्याकडे फणसाचं झाड नव्हतं तेव्हा आम्ही माळेच्या फणसाचे फणस भाजीसाठी किंवा पुसभाजी करण्यासाठी घेऊन यायचो. आणि पिकलेले कापे-बरके फणस आम्हाला शेजाराच्या घरांतील काका-काकू आणून द्यायचे.
पण त्याआधी माळेचो फणस म्हणजे काय? ते सांगते.
आमच्या परबवाडीत गोसावी आडनावाची काही घरं आहेत. त्यांच्यामध्ये एक अशी रीत आहे की त्यांच्या समाजातील कोणी व्यक्ती मृत झाल्यास आपल्या परसातलं एक झाड दान करायचं. म्हणजे त्या झाडाला फुलांची माळ घालायची. या रीतीप्रमाणे आमच्या वाडीत त्यांनी फणसाचं झाड दान केलं होतं. त्या झाडाला माळ घातली होती. असं आमच्या शेजारची आजी सांगायची. ती खूप वयस्कर होती, पण आम्ही तिला वहिनीम्हणून हाक मारायचो. ती आम्हाला वाडीतल्या खूप जुन्या झालेल्या, विस्मरणात गेलेल्या गोष्टी सांगायची. त्यातलीच ही एक...
म्हणजे रीतीनुसार माळेच्या फणसाचे फणस कोणीही काढून नेऊ शकत असे. पण आम्हाला आता माळेच्या फणसाची वाट बघावी लागत नाही. आमच्या परबवाडीत भरपूर फणसाची झाडं आहेत.
फणस हे फळ मला खूप गंमतीशीर वाटतं. वरून काटे, आतून गोड...त्याची भाजी करा किंवा असेच पिकल्यावर खा... आणि गऱ्यातील आठीळा भाजून खा, उकडून खा, त्याची भाजी करा किंवा सांबाऱ्यात घाला.
आमच्या गावी फणसाची भाजी करायचो तो दिवस म्हणजे एक मोठा सोहळा असायचा. आम्ही चार-पाच घरांची मुलं, बायका सगळे एकत्र जमायचो. भाजीचे फणस मधुकाका फोडून द्यायचे. मग आम्ही सगळे तो फणस साफ करायला सुरुवात करायचो. मोठ्या बायकांच्या फणस साफ करता करता इकडच्या तिकडच्या गजाली सुरू व्हायच्या, आम्हाला वाटायचं त्यांचं लक्ष नाहीय...आम्ही हळूच साफ करता करता कच्चे गरे अधून-मधून तोंडात टाकायचो. भाजी करेपर्यंत धीर धरवतो तरी कुठे...
मग मोठ्या काकू दम भरायच्या, कच्चे गरे खाऊ नका, पोटात दुखेल...पटपट साफ करा...मगे ताटलेत भाजी आणि पेज घेवन हवी तेवढी भाजी खावा, आमी काय बोलाचव नाय... गजाली मारत असल्या तरी मोठ्या बायकांचं लक्ष असायचंच आमच्यावर!
मग आम्ही शांतपणे फणस साफ करायचो...
फणस साफ करून झाल्यावर कुणाच्या तरी एकाच्याच घरच्या चुलीवर ती भाजी मोठ्या अल्युमिनिअमच्या टोपात शिजवली जाई. भाजी तयार झाल्यावर काकू सगळ्या मुलांना हाका मारायच्या. वाडगाभर उकड्या तांदळाची पेज आणि बशीभर भाजी घेऊन फणसाच्या झाडाखाली असलेल्या आमच्या खळ्यात(अंगणात) बसायचो.
तेव्हा आम्ही एक गंमत करायचो. पेज पिण्यासाठी चमचा न घेता, फणसाच्या झाडाची पानं घेऊन त्याची हाताने खोलपी करायचो. त्या खोलपीने पेज प्यायची. खूप मजा वाटायची. त्या फणसाच्या भाजीची चव अजुनही जिभेवर रेंगाळते...

मार्च-एप्रिल महिन्यामध्ये आमच्या इथल्या शहरातल्या मार्केटमध्ये एक फणसवाला येतो. त्याच्याकडे छोटे कुयरी फणस, पिकलेले फणस आणि भाजीचे कच्चे फणसही असतात. त्याच्याकडून फणस खरेदी करताना त्याच्याशी किंमतीमध्ये घासाघीस करताना गावाकडे खळ्यात भाजीसाठी आणलेले सात-आठ फणस ओळीने ठेवलेले आठवतात. मग कळत नाही का हसायलाच येतं. त्या फणसवाल्याशी इतर भाजीवाल्यांसारखी मैत्री केलीय. त्यामुळे त्याच्याकडे कच्चे फणस असले की तो अगदी हाक मारून बोलावतो. कच्चा फणस खरेदी केल्यावर हातावर दोन पिकलेले कापे गरे ठेवतो. म्हणतो, तुझ्याएवढीच मला एक मुलगी आहे, ती बिहारमधल्या एका गावात राहते. त्याच्या चेहऱ्यावर माझ्याकडे बघून मुलीच्या आठवणीचं एक समाधान आणि माझ्या चेहऱ्यावरही एक समाधान... फणसाची भाजी करताना गावाकडच्या फणसाची भाजी करतानाच्या आठवणींचं...

मालवणी मसाला घालून केलेली फणसाची भाजी

भाजीसाठी साफ केलेला फणस

भाजीसाठी काढलेले फणस
https://www.facebook.com/malvanicuisine/
मालवणी पाककृतींसाठी परबांचो पावनेर या फेसबुक पेज ची वरील लिंक ओपन करा.

 

Thursday, 15 September 2016

नदीकिनाऱ्यालगतची मालवणी खाद्यसंस्कृती

कोकण म्हटलं की समुद्रकिनारा आणि कोकणातील खाद्यसंस्कृती म्हटलं की भात, मासे आणि नारळ या पलिकडे आपण सहसा जात नाही. भूगोलात एक प्रश्न विचारला जायचा, समुद्रकिनाऱ्यावरील लोकांचे अन्न कोणते...तेव्हा गुरुजींनी शाळेत सांगून ठेवलं होतं की या उत्तराला डोळे झाकून भात आणि मासे असंच उत्तर लिहायचं. कोकण म्हणजे समुद्रकिनारा आणि जेवणात भात, मासे त्याचबरोबर अलिकडे सर्वांच्याच तोंडी असलेली रेसिपी म्हणजे कोंबडी वडे. पण समुद्रकिनारा नसला तरी नदी, ओढ्याच्या (व्हाळ) काठावर वसलेली गावांची खाद्यसंस्कृती किती समृध्द आहे. तेही आपण जाणून घेतलं पाहिजे. 

मला आठवतंय आमच्या कॉलेजमध्ये वेंगुर्ल्याच्या मॅडम होत्या, त्या नेहमी आम्हाला चिडवायच्या, तुम्हाला नदीकडच्या लोकांना काय कळणार ताज्या माशांचं महत्त्व आणि त्याच्या पाककृती. त्यावेळी त्यांना उत्तर द्यायला यायचं नाही. कारण त्यांच्या वयाचा मान राखून बोलता यायचं नाही. आम्ही माशांच्या पाककृतींमध्ये लसूण वापरतो. यालाही त्या हसायच्या. आमची नदीकडची खाद्यसंस्कृती किती बेस्ट आहे, हे पटवून देता यायचं नाही. पण आता तसं राहिलेलं नाही. म्हणूनच समुद्राकडच्या मंडळींनी नदीकडच्या लोकांना चिडवू नये. दोन्हीकडच्या खाद्यसंस्कृती समृध्द आहेत. कारण दोघांचीही खाद्यसंस्कृती जगभर मालवणी खाद्यसंस्कृती याच नावाने ओळखली जाते.

समुद्रकिनाऱ्यालगतच्या गावात ताजे मासे सहज मिळतात. त्यामुळे त्यांच्या माशांच्या पाककृतीमध्ये कांद्याचा वापर आढळतो. नदीकडच्या मंडळींकडे समुद्राचे मासे त्यांच्या गावच्या बाजारात येतात. तेव्हा ते त्यांना मिळतात. ते घरी आणेपर्यंत उशीर होतोच. त्यामुळे हे मासे शिजवताना त्यात लसूण वापरला जातो. कांदा नाही वापरत. त्याचबरोबर नदीकडची मंडळी सुके मासे घरी आणून त्याची साठवणूक करतात. जोडीला नदीचे मळये मासे, शिंपल्या, कोके, खेकडे जेवणात असतातच.
नदीकडच्या काही गावांमध्ये जेवणात मटण वारंवार केलं जातं. काही ठिकाणी पाहुणे आले की त्यांना पावनेर (मेजवानी) म्हणून मटणाचं जेवण केलं जातं. 

नदीकडच्यांच्या ताटात महिन्यातून दोनदा ते तिनदा मासे दिसतात. कोंबडी, बकरा, ससा, जिवाद, साळींदर, डुकर, भेकरं यांचं मटण असतं. मटणाचा रस्सा करतील आणि सुकं मटणही करतील. कोकणातील काही गावांमध्ये गावपारध होते. तेव्हा डुकर मारला जातो. त्याचं गाव जेवण असतं. (इथे या प्राण्याचा उल्लेख करून कुठल्याही समाजाला दुखावण्याच्या हेतू नाही.)
म्हणूनच नदीकडच्या लोकांची समुद्राचे आणि नदीचे मासे, सुके मासे, आणि मटण त्याचबरोबर शाकाहारी जेवण अशी मिश्र आणि समृद्ध अशी खाद्यसंस्कृती आहे. सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार या वारी मालवणी मंडळींच्या जेवणात शाकाहारी पदार्थ असतात. खासकरून गोडी डाळ आणि तिकटी डाळ तर असतेच असते. तसेच मालवणी मंडळी आमटी किंवा सार मसाल्याचं केलं असलं तर भाजीत हिरवी मिरची घालतात. भाजी मसाल्याची केली तर आमटी आणि सार हिरव्या मिरचीचं करतील. हे कसं तर ते आपण वेगवेगळ्या पाककृतींच्या माध्यमातून परबांचो पावनेर या पेजवर पुढे बघणारच आहोत.


आमचं गाव मालवण तालुक्यात असलं तरी मालवण, कुडाळ आणि कणककवली या तीन तालुक्यांच्या मध्यभागी आहे. त्यामुळे नदीकडच्या समृध्द खाद्यसंस्कृतीविषयी जिव्हाळा आहे. आमच्या गावात दिवसभरातून एकदा सकाळी एक एसटी मालवणला जाते. तेवढाच काय तो आमचा मालवण तालुक्याशी संबंध. पण तरीही समुद्रकिनाऱ्याचं आकर्षण काही सुटलेलं नाही. ते वाढतच जाणार आहे. असं असलं तरी नदीच्या काठावर बसून नदीकाठाची संस्कृती अनुभवणं यातही वेगळी गंमत आहेत. नदी जशी प्रत्येक काठावर वेगवेगळ्या रुपात येऊन तिथली लोकसंस्कृती समृध्द करते. तशीच नदीकाठावरील लोकांच्या खाद्यसंस्कृतीची रुपं आहेत. तिही प्रत्येकाने अनुभवायलाच हवी. त्यांचा आस्वाद घेतलाच पाहिजे, हा आस्वाद फाईव्ह स्टार हॉटेल, रेस्टॉरेन्ट मधल्या सवयींचा चष्मा उतरवून निखळ, मनसोक्त घ्यायला हवा.

ओवळिये गावची जीवनवाहिनी असलेली तिसगा नदी, फोटो योगेश परब
https://www.facebook.com/malvanicuisine/

परबांचो पावनेर या पेज ची लिंक

Sunday, 10 July 2016

६ शब्दांची गोष्ट

#sixwordstory

१)मंगळवाल्या मुलीची पत्रिका हरवली; लग्न ठरलं!

२)२९ वर्षांच्या एका लेखिकेला इच्छामरण हवंय...

३)मुंबयच्या धयकाल्यात गावचा चेडू हरावला आसा...

४)आपल्या माणसांबरोबर जिंकायचं नाही, जगायचं आहे.

५)मन मोकळं केलं नि जायबंदी जाहलो...

६)फक्त स्त्रियाच असलेलं एक गाव आहे...

७)लेखनाची केलेली स्तुती; आनंददायी तिककीच दुःखदायी

८)तू चंचल आहेस, म्हणून संपलं सगळं...

९)कौलारू घर; टपटप पडणारी पावसाची सर

१०)Love is something that finds you.

११)मेरी कहानी किताबों से शुरू हुई

१२)अलग सोच; खुद से नया रिश्ता

१३)स्टोरी छान आहे; पण मसाला हवा.

१४)मनातल्या पावसाचा भार शब्दांनी कितीदा वहायचा...

१५)काश हम कॉलेज में मिलें होतें...

१६)आरसा सत्य सांगतो, कागद खोटं बोलतो...

१७)निरागसतेला चुरगाळणारी माणसं, हसतात-खिदळतात-ओरडतात

१८)तू काय करतेस? सध्याचा गंभीर प्रश्न

१९)पागल दिल अकेला तड़पता रहा, बेवजह...

२०)हस्ती ढूँढनें निकले, कश्ती ले डूबी...

२१)गोंधळलेली तरुणाईबसला शिक्का, काय करणार?

२२)Yesterday & tomorrow exist for today…

२३)The root of suffering is attachment…

२४)दुष्काळावर चर्चास्थळः फाईव्ह स्टार हॉटेल

२५)कला आनंद देते आणि दुःखंही देते...

२६)कुणालाच माहीत नाही, तो कलावंत आहे...

२७)प्रेमासाठी आसुसलेला; तडफडला, आम्ही नाही पाहिला...

२८)उजेडाचं वेड असलेला माणसांच्या अंधारात हरवून गेला...

२९)Words & visuals happily married “in real”

३०)सध्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पैशानेच मिळतात!

३१)ती बघा! बॉयकटमारलेली स्त्रीवादी लेखिका...

३२)स्त्रीलेखिकांचं स्त्रीवादी लेखनविकतचं दुखणं...

३३)कलम का सहारा, कलम हो गया


अर्नेस्ट हेमिंग्वे या प्रसिध्द लेखकानं पहिल्यांदा वरील ६ शब्दांची गोष्ट लिहिली. त्यानंतर ६ शब्दात गोष्ट लिहिण्याची सुरुवात झाली.

Thursday, 7 July 2016

स्वप्नातला राजकुमार

Hi! मी तुझ्या स्वप्नातला राजकुमार बोलतोय तुझ्याशी, या पत्राच्या माध्यमातून... ज्याची स्वप्नं तू कळत्या वयाची झालीस तेव्हापासून आतुरतेने पाहतेयस. पहिल्यांदा मी तुला Sorry म्हणतो. पण ‘Sorry’ हा खूपच साधा शब्द झाला. तुझ्या आयुष्यात मी असणार की नाही?’ असे प्रश्न उपस्थित केले गेले. तेव्हा तू खचून गेली नाहीस, तुझ्या या अनोळखी अव्यक्त प्रियकरावर विश्वास ठेऊन प्रेम करतच राहिलीस. म्हणूनच म्हणतो, हा ‘Sorry’ शब्द खूपच साधा आणि त्याच्याहीपेक्षा तुला सहन कराव्या लागणाऱ्या वेदना तीव्र आहेत. तू आतापर्यंत कसं एकटीनं सारं सहन केलं असशील, याची कल्पना करणंही मला असह्य होतंय... कितीदा तुझं मन दुखावलं गेलं असेल, तू कित्येक रात्री माझ्या आठवणीने जागत घालवल्या असशील. खूपदा तुझा प्रेमावरचा विश्वास डगमगला असेल, तरीही तू माझी वाट पाहत राहिलीस. कितीदा पावसात एकटीच भिजत राहिली असशील, माझं तुझ्यासोबत असण्याचं स्वप्न पाहत. फेसाळता समुद्रकिनारा पाहिल्यावर, बहरलेला ऋतू पाहिल्यावर, गुलाबाची लाल फुलं पाहिल्यावर तुझ्या मनात माझ्याविषयीची प्रेमभावना दाटून येत असेल.
Now Relax! तुझी ही प्रतिक्षा लवकरच संपेल. कारण मी लवकरच तुझ्या आयुष्यात येईन आणि तुझा प्रेमावरचा विश्वास दृढ करेन.
Prince Charming, भावी प्रियकर, स्वप्नातला राजकुमार, होणारा नवरोबा अशा कितीतरी नावांनी तुझ्या डायरीतली कित्येक पानं फक्त मी कसा असेन यावर लिहिली असशील. मला माहीत आहे की तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारा मी या जगात आहे की नाही असं तुला कधीकधी व्याकूळतेने नियतीला विचारावसं वाटतं. तुला त्या अधीर नात्याची ओढ लागलेली आहे आणि ती तू लपवू शकत नाहीयेस, तुझे डोळे सतत मला शोधतायत...बस ! आता तू काहीच करू नकोस, सावर स्वतःला आणि हा बघ मी आलोय. कुठल्याही क्षणी तुला भेटेन. सकाळी तू ऑफीसला जाताना घाई घाईत Train पकडशील तेव्हा हळूच मी तुझ्या बाजूने जाईन. तू Facebook open करशील तेव्हा Suggest Friends च्या List मध्ये माझं नाव असेल. तुझ्या मित्र-मैत्रिणींच्या आग्रहाखातर तू तुझ्या आवडत्या एक साध्याशा ड्रेसमध्ये पार्टीत येशील, तिथेही तुला मी भेटेन कदाचित. तुझ्या आवडत्या लेखकाचं पुस्तक शोधत तू Crossword मध्ये रमलेली असशील आणि मला तुझा धक्का लागेल... किंवा Market मध्ये Shopping करत असताना अचानक तुझं माझ्याकडे किंवा माझं तुझ्याकडे लक्ष जाईल.
अशा कितीतरी ठिकाणी आता मी तुला भेटण्याची शक्यता आहे. कारण मी तुला भेटायला आलोय. आणी कायमचा तुला प्रेमाच्या राज्यात नेण्यासाठी आलोय.
मला माहीत आहे की तू आतापर्यंत एकटीच होतीस, लोक तुला ३० वर्षांची घोडनवरी झालीस म्हणून टोमणे मारत असतील. सगळ्यांच्या लटक्या चिडवण्याला, हिणवण्याला तू वैतागली असशील. त्यामुळे तुला माझा रागही आला असेल. तुझं माझ्यावर रागावणं स्वाभाविक आहे. पण तू काळजी करू नकोस. तुला प्रेमाची वाट दाखवणारा, तुझ्या आयुष्यात Thrill आणि Excitement  घेऊन येणारा...तो मीच आहे, मी आलोय. ज्याच्याशी तू तुझी सगळी सुखं-दुःख मनमोकळेपणाने बोलू शकशील.
सगळं काही संपलं असताना मी तुझ्यासोबत आहे असं म्हणणारं कोणीतरी तुझ्यासोबत असावं ही तुझी इच्छा स्वार्थी नाही, Natural आहे. म्हणूनच तुला अजिबात वाट पहायला न लावता, एकही क्षण न दवडता मी आलोय, तुझ्यासाठी फक्त तुझ्यासाठी.
आतापर्यंत तू माझ्यासाठी थांबलीस आणि प्रेमावरचा विश्वास उडू दिला नाहीस म्हणून मला अगदी मनापासून तुला Thanks म्हणायचं आहे. मीही तुझ्यासारखा चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे जेव्हा कधी आपण भेटू तेव्हा मी तुला आवडेन आणि तू माझा Sole mate म्हणून स्वीकार करशील. तू खूप चांगली आहेस, निरागस आणि निखळं हसणं कधी विसरू नकोस. मी येतोय.

तू माझ्या आठवणीत जागून कितीतरी sad songs download करून त्यांची playlist बनवली असशील. ती आता कायमची delete कर… कारण तुला आता फक्त माझ्यासोबत romantic songs गुणगुणायची आहेत. प्रेमात पडणं किती सुंदर असतं त्याची जाणिव तुला आहे पण मी तुझ्यासोबत नसल्याने तू आतल्या आत झुरते आहेस. तुला प्रेमाची अनुभूती देण्यासाठी मी येतोय. प्रेमात पडल्यावर परस्परांना पाहताना नजरेत हरवून जाणं, तरीही स्वतःला स्वतःच नव्याने सापडणं, म्हणजे काय असतं? याची जादू अनुभवायला सज्ज हो. तुझी Love Songs ची playlist तयार ठेव. अब दिल में Guitar बजनी चाहिए...तड़पनेवाले मन को अब प्यारीसी धुन गुनगुनाने दो...
मी आता तुझ्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाही. कधी तुला भेटतो असं झालं आहे. मला माहितेय माझा हात हातात घेऊन तुला खूप गोष्टी सांगायच्या आहेत. मलाही त्या गोष्टी तुझ्यात हरवून जाऊन ऐकायच्या आहेत. मला तुझा चेहरा पाहत तुझ्या गालांना स्पर्श करायचा आहे. तुला डोळ्यात साठवायचं आहे. तुझ्या केसांवरून तुझ्याही नकळत अलगद हात फिरवायचा आहे. तुझ्या चेहऱ्यावर kiss करत तुला घटट् मिठी मारायची आहे. आणि तुला सांगायचं आहे की मी या क्षणाची किती वाट पाहिलीय.
मला माहितेय मला भेटल्यावर तुझ्याही भावना यापेक्षा वेगळ्या नसतील. आपली लवकरच भेट होईल. तुझं सारं दुःख विसरून जा. हा बघ मी आलोय. निराशेचे काळे ढग बाजुला कर. मनावरचं मळभ दूर कर. अश्रुंना आत कोंडू नकोस वाहू दे. मोकळी हो. कदाचित तुझ्या घराच्या समोरून जो रस्ता जातो तिथून तू वळतानाही मी तुला भेटेन...
तुझाच,
तुझ्यावर मनापासून प्रेम करणारा तुझा भावी प्रियकर...

आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...