Wednesday, 9 December 2015

FUNNY SCENE

(अपूर्वा बागेत बसली आहे. तिथे विपुल येतो. तिच्या बाजूला येऊन बसतो. अपूर्वा खूश होते. पण त्याचं हे अचानक येणं असतं. त्यामुळे अप्पूला आश्चर्य वाटतं.)


अपूर्वा – हाय विपुल.
विपुल – हाय अप्पू...तू इथे कशी काय...
अपूर्वा – मी इथे रोज येते, फेऱ्या मारायला. मला हे गार्डनही खूप आवडतं.
विपुल- ओ, फाईन...
अप्पू - पण तू इथे कसा काय...
विपुल - मी माझ्या गर्लफ्रेन्डला भेटायला आलोय. (त्याच्या हातात मोठा येलो फ्लावर्सचा बुके असतो.)
अप्पू- (निराश होते.) ओह... (उठून जायला निघते...)
विपुल – (तिला हाताला धरून बसवतो.) पण तू बस ना...काहीच हरकत नाही. तिला राग नाही येणार...
(ती नाईलाजाने बसते. तिच्या मनात हलचल चालू आहे. विपुल तिची फिरकी घेतोय हे कळत नाही.)
अप्पू मला काही टिप्स दे ना...

अपूर्वा – कसल्या टिप्स...
विपुल – हेच की तिच्याशी काय बोलायचं, कसं बोलायचं...
अपूर्वा – आता ते मी कसं सांगू...तुमचं दोघांचं प्रेमाचं नातं आहे.
विपुल – पण तू दे मला टिप्स, ऐकेन मी तुझं...
अपूर्वा – नाही, नाही मला नाही देता येत कसल्या टिप्स-बिप्स... मी जाते...तु तूझ्या गर्लफ्रेन्डला भेट, तिला बुके दे... माझी लुडबुड मध्ये कशासाठी...
विपुल – अगं ए थांब... (विपुलच्या चेहऱ्यावर खोडकर स्माईल)
अपूर्वा- नाही, मला आता आठवलं मला घरी खूप काम आहे. मी जाते..
विपुल – तू गेलीस तर माझी गर्लफ्रेंड मला कशी भेटणार... (अजूनही अप्पूला कळत नाहीय. विपुल तिची गंमत करतोय ते)

अपूर्वा – म्हणजे... माझ्या जाण्याचं आणि तुझ्या गर्लफ्रेंडच्या येण्याचं काय कनेक्शन...
विपुल – कनेक्शन आहे...मॅडम...(असं बोलून तो तिचा हात धरतो. आणि तिच्या हातात तो बुके देतो.)
अपूर्वा – विपुल यू कार्टून... (आत्ता तिला कळतं, अप्पू खूश होते, आणि ती त्या फुलांच्या बुकेनेच त्याला मारू लागते. तोही हसतो आणि तिचा मार चुकवू लागतो.)
विपुल – हूँ...हूँ..कसं फसवलं, एका क्यूट मुलीला...

अपूर्वा – (विपुलकडे पाहते, आणि लाजते. पुढे बोलते) पण अश्शी सोडणार नाही तुला...(त्याच्या कानाला त्या बुकेतलं एक फुल लावते.) चल उठबश्या काढ, थट्टा केलीस ना माझी...
विपुल- बरं बाबा...काढतो..(तो उठबश्या काढू लागतो. मग तिच त्याला थांबवते)...बस पुरे आता निघूया...(विपुल तिच्या पुढे दोन हात करतो, म्हणतो उठायला मदत कर, ती त्याला हात द्यायला जाते, तेव्हा तो तिला ओढतो. आणि दोघेही बागेतल्या हिरवळीवर पडतात. मग बराच वेळ हिरवळीवर झोपून आकाशाकडे पाहत राहतात....


Scene Cut

SAD SCENE

(विपुल आणि अपूर्वा खोलीत आहेत, अपूर्वा विपुलची बॅग भरते आहे.)

अपूर्वा – तुला दिल्लीला जावंच लागणार आहे का, नाही गेलास तर नाही का चालणार... कितीतरी दिवसांनी आज वेळ मिळाला होता...आज कुठेच जायचं नाही, फक्त तुझ्याच अवती भोवती राहून तुझ्याशी बोलत रहायचं ठरवलं होतं मी...आणि आता एक फोन आला काय...आणि तू निघालास काय... मी तुला अजिबात जाऊ देणार नाही. सांग तुझ्या साहेबांना मला माझ्या अप्पूसोबत रहायचं आहे...मी नाही येणार दिल्लीला...तिला सोडून कुठेच जाणार नाही. (ती त्याच्या हाताला घट्ट पकडून रडवेल्या स्वरात बोलते)
विपुल - अगं ए, वेडी आहेस का तू? 
फक्त चार दिवसांचा तर प्रश्न आहे, मी हा गेलो आणि हा आलो !
अपूर्वा – नको ना जाऊस, मला सोडून...(थोडं थांबून) ए मी येऊ का तुझ्यासोबत तिकडे?
विपुल – अगं पण तू तिकडे येऊन काय करणार, बोअर होशील.
अपूर्वा  - मी दारात उभी राहून तुला जाताना मनापासून बायसुध्दा करू शकणार नाही... (रडते आहे आणि ती त्याला मिठी मारते.)

विपुल - (तिच्या डोक्यावरुन हात फिरवत बोलतो.) मी दिल्लीहून आलो ना की आपण कुठेतरी लांब फिरायला जाऊया...दोघंच...प्रॉमिस...तू पण ना...तिचे डोळे पुसतो. पहिल्यांदाच तुझं इतकं हळवं रूप पाहतोय मी. पण माझी अप्पू अशी नाही... ती खूप स्ट्राँग गर्ल आहे...राईट...हे घे. काळजी करू नकोस. मी माझं काम संपलं की एक क्षणही तिथे थांबणार नाही. (तो तिला एक छोटंसं क्यूट टेडिबियर देतो.) तुला माझी खूप आठवण आली ना की याच्याशी बोल, तुला खूप छान वाटेल...आणि कसलंही टेन्शन घेऊ नकोस. मी आहे ना... तुझं सगळं टेन्शन मला दे...आणि तू हस पाहू...तुझी क्यूट स्माईल बघितल्याशिवाय माझाही पाय निघणार नाही घरातून...(अप्पू चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करते, पुन्हा रडवेल्या डोळ्यांनी त्या टेडिबियर कडे पाहते. तो हातात घेऊन पुढे चालू लागते.) (तिला पाठमोरी जड पावलांनी पुढे जाताना पाहून म्हणतो.) अजिबात नाही ऐकणार ही मुलगी...जिद्दी आहे...
पहिल्यांदा हिला भेटलो, तेव्हा वाटलं नव्हतं...या मुलीच्या मी कधी प्रेमात तरी पडेन का, सारखे भांडायचो...आणि आता हिच्याशिवाय माझ्या आयुष्याची कल्पनाच मी करू शकत नाही. आय मिस यू टू अप्पू...

(आणि स्वतःच्या डोळ्यांच्या ओलावलेल्या कडा पुसतो.  त्याच्यासाठीही तिला सोडून जाणं, जिवावर आलं आहे. असे विपुलच्या चेहऱ्यावर भाव… बॅग उचलून जायला निघतो...Scene cut)


ROMANTIC SCENE


(समोर सनसेट होतो आहे, मस्त माहोल आहे, विपुल आणि अपूर्वा सुर्यास्त पाहत बसले आहेत. समोर पाहत आहेत आणि पुन्हा एकमेकांकडे पाहत आहेत, एकमेकांकडे पाहताना गढून गेले आहेत, आसपासचा विसर पडला आहे, हळुहळु दोघांचे हातात हात गुंफले जातात, विपुल तिचा हात आपल्या ह्रदयावर ठेवतो. तिच्या हाताला किस करतो, अपूर्वा लाजतेय... ती त्याचा हात पटकन सोडवून घेते.)

अपूर्वा - किती मस्त वाटतंय, असं वाटतंय इथेच बसून रहावं तासनतास..
विपुल - हो का (लाडाने)
अपूर्वा - हो... मला तुला काही सांगायचंय...
विपुल – पण मला माहितेय, तुला काय सांगायचंय (तो तिच्या डोळ्यात पाहतो आणि तिचा हात पुन्हा आपल्या हातात घेतो.)
अपूर्वा – तू माझ्या आयुष्यात आलेला पहिला आणि शेवटचा मुलगा आहेस... तुझ्याशिवाय इतर कुणावरही मी इतकं प्रेम केलं नाही, आणि तुझ्यानंतर मी कुणावरही इतकं प्रेम करू शकणार नाही. (तिच्या डोळ्यातून अश्रू येतात.)

विपुल - (तिच्याकडे पाहत आहे, तिचं बोलून झाल्यावर दोन सेकंद थांबून बोलतो.) मला माहितेय. (आणि तिला प्रेमाने जवळ घेतो. ती त्याच्या छातीवर डोकं टेकते. तो एकदा तिच्याकडे पाहत मग पुढे सुर्यास्ताकडे पाहतो. आणि पुढचं वाक्य बोलतो.) आजपासून पुन्हा नव्याने आपलं आयुष्य सुरू करूया. इथून पुढे, आपण कधीही एकमेकांशी भांडायचं नाही, एकमेकांवर रागवायचं नाही. जे राग, लोभ, रुसवे फुगवे असतील ते दोघांनी मिळून सोडवायचे. आता आपल्या दोघांमध्ये कुणा तिसऱ्याला जागा नाही.
अपूर्वा – तुला माहितेय...माझी आई नेहमी म्हणायची, काळजी करू नकोस, अखेर तुझं विपुलशीच जमणार आहे. तेव्हा मी आईला आपले भांडणाचे किस्से सांगायचे. आणि तुझ्यावरचा राग घरातल्यांवर निघायचा. तेव्हा आई जवळ घेत म्हणायची, अप्पू तुझ्या बोलण्यात हजारदा विपुलचं नाव येतं. आणि विपुल किती चांगला मुलगा आहे. तुम्ही दोघांनी मिळून प्रॉब्लेम्स सोडवत का नाही. असं एकट्यानं झुरत बसण्याला काय अर्थ आहे?

विपुल - हो, इतके दिवस तू माझ्याशी बोलली नाहीस...तर मलाही चैन पडत नव्हतं. सारखा तुझ्या फोनची वाट पाहत होतो. वाटायचं...आत्ता तू फोन करशील आणि विचारशील...कधी भेटतोस मला...तुझ्याशी खूप बोलायचंय...
अपूर्वा – होतं असं कधी कधी की आपण काही वेळा आपल्या खूप जवळच्या माणसाला समजूनच घेऊ शकत नाही. तेव्हा डोक्यात राग असतो. त्यापुढे आपुलकीचे चार शब्दही खोटे वाटू लागतात. त्यासाठी थोडा वेळ जाऊ देणं हेच चांगलं...

विपुल - त्या दिवशीचे आपण हे आपण नव्हतोच दुसरेच कुणीतरी होतो. पण मला आज तुझ्याकडून एक वचन हवंय अप्पू, लग्नानंतर आपण एकमेकांचे बोअरींग लाईफ पार्टनर व्हायचं नाही...आपण एकमेकांचे बेस्ट फ्रेंड्स व्हायचं. आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण एन्जॉय करायचा. तू देशील मला साथ...
अपूर्वा- (मानेनेच "हो" म्हणते.)


 (आता आपल्याला ते दोघे एकमेकांना बिलगून बसलेले पाठमोरे दिसतात आणि SCENE CUT)

एका ‘मनस्विनी’ चा Selfie माझ्या नजरेतून

अत्यंत सोशिक, कष्टाळू, मृदू, मनमिळाऊ, चेहेऱ्यावर नेहमी स्मितहास्य, सर्वांना सांभाळून घेणारी, एखाद्या वेळी मनाला न पटलेली गोष्ट होत असल्यास दुर्गेचं रुप धारण करणारी, शिस्तप्रिय, प्रेमळ, देवावर श्रध्दा असलेली, परंपरा आणि संस्कृतीला जपणारी...आपल्या कुटुंबासाठी झटणारी अशी ही मनस्विनी...

एका अवखळ मुलीचं रुपातंर परिपूर्ण वात्सल्याने ओतप्रोत अशा माऊलीत झालं. त्यानंतर तिचा आता सद्सद्विवेकबुध्दीशी सुरू असलेला झगडा...सारंच विलक्षण आणि थक्क करणारं आहे. मनस्विनीच्या या व्यक्तिमत्त्वाची परिपूर्ती जाणून घेण्यासाठी तिच्या बालपणापासूनच सुरुवात करायला हवी... नाही का?
व्यक्तिचं घडणं, वाढणं आणि काळाच्या प्रत्येक टप्प्यावर समृध्द होत जाणं... याची बिजं बालपणात दडलेली असतात.

गिता मनोहर धुरी मनस्विनीचं माहेरचं पूर्ण नाव. कृष्णाने अजूर्नाला गिता सांगितली आणि कर्माचं महत्त्व पटवून दिलं. अगदी तसंच गिताच्या लहानपणापासून तिच्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सतत काम करत राहण्याची शिकवण तिला तिच्या आईकडून मिळाली. तिची आईसुध्दा कर्म करत रहा या विचारांची. एका जागी बसणं, त्या माऊलीच्या गावीही नव्हतं.
आपल्या आईकडून गिताला संस्काराचं बाळकडू मिळालं. बाकी कुणीही आदर्श नव्हते तिच्यासमोर...
आई-बाबा आणि ती मिळून चार भावंडं, असं तिचं मातीच्या घरात राहणारं गरीब कुटुंब. कोकणातील निसर्गसमृध्दीने नटलेल्या गावात कौलं आणि गवताच्या पेंढ्यांनी शाकारलेल्या टुमदार मातीच्या घरात राहणारी ही मुलगी... घराच्या चार भिंती, समोरचं मोठं अंगण आणि घराला लागूनच नजरेत मावणारी शेती या ठिकाणी हुंदडत, आला दिवस हसून साजरा करत गिताचं बालपण सरलं. फार लहान वयातच ती आपल्या कुटुंबासाठी कर्ती स्त्री झाली. घरच्या गरिबीमुळे नातेवाईक फारसे फिरकायचे नाहीत.
सकाळी लवकर उठायचं, घरचं आवरायचं, शाळेत जायचं... शाळेतून घरी आल्यावर शेतातल्या कामांना जायचं, रात्रीचा एक तास तिला अभ्यासाला मिळायचा... आणि दिवसभर कष्ट केलेल्या गिताला शांत झोप यायची.

एके दिवशी गावात धरण बांधलं जाणार असल्याची बातमी पसरली. तेव्हा गिता ७ वर्षांची होती. गावात धरण बांधण्याची सरकारी योजना मंजूर झाली आणि लागलीच या प्रकल्पाचं काम सुरू झालं. गावातल्या खूप लोकांना रोजगार मिळाला. गिताही आपली शाळा सांभाळून धरण बांधण्याच्या कामाला जाऊ लागली. तिला अभ्यासाला वेळ मिळत नव्हता. पण तिची बुध्दी अतिशय तल्लख होती. वर्गात शिकवलेलं तिच्या नीट लक्षात रहात असे. म्हणून काम सांभाळून शाळेला जाण्याची तिची धडपड सत्कारणी लागत होती.
बाई मी धरण,
धरण बांधिते गं...
माझं मरण,
मरण कांडते गं...

बहिणाबाईंना स्वतःच्या अनुभवाचा काव्यातून झालेला हा साक्षात्कार गिता प्रत्यक्षात जगत होती. तिच्या आजूबाजूच्या वास्तवाने तिचं बालपण होरपळत होतं. पण तिने मानाच्या एका कोपऱ्यात आपल्याला बालपणाला प्राजक्त फुलासारखं जपलं होतं.
म्हणून तर कामाचा कितीही डोंगर उपसला तरी गिताचा चेहरा हसतमुख असायचा...
मिल बंद पडल्यानंतर पुन्हा आपल्या गावी आलेला दारूडा बाप, नरिमन पॉईंट सारख्या ठिकाणी चांगल्या नोकरीवर असलेल्या तिच्या मोठया भावालाही त्याची नोकरी गमवावी लागली. आणि त्यानेही बाटली जवळ केली.
घराची पूर्ण जबाबदारी गिताच्या आईने आपल्या डोक्यावर घेतली आणि गिताला त्यासाठी तिच्या आईचा भक्कम आधार व्हावं लागलं. कारण तिची आई नवऱ्याच्या आणि मुलाच्या प्रतापामुळे पिचलेलीच होती. फक्त तिच्याकडे असलेल्या जिद्दीच्या बळावर तिने संसार सावरायचा विडा उचलला होता. गिता आपल्या माऊलीचं दुःखं जाणून होती. म्हणून आईच्या नेहमी सोबती असायची. आईचं सारं काही ऐकायची.

शाळेचं नववीचं वर्ष होतं. तिला खूप मन लावून शिकायची इच्छा होती. पण कामाचा रगाडा, मानसिक कोंडमारा यामुळे आपल्या पुढील शिक्षणाचं कसं होणार असं भलंमोठं प्रश्नचिन्ह गितासमोर होतं. तरीही तिने जिद्दीने नववीची परीक्षा दिली. निकालाच्या दिवशी तिच्या जिवाची घालमेल होत होती. परीक्षेत चांगले गुण नाही मिळाले, तर हेच शाळेचं शेवटचं वर्ष ठरेल... पण निकाल हाती येताच गिता आनंदून गेली. तिला खूप चांगले गुण मिळाले होते. आणि ती वर्गात ५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. तिला इतका आनंद झाला होता की साऱ्या गावाला ओरडून सांगावं... ती खुशीत धावतच घरी गेली. आपला आनंद घरातल्यांसोबत व्दिगुणित करण्यासाठी... पण इकडे घरात तिच्यासाठी एक मोठा अनपेक्षित धक्का तिची वाट पाहत होता. एका चुलत काकीने तिच्यासाठी दूरच्या गावचं स्थळ आणलं होतं. गिताचा सारा उत्साह क्षणार्धात मावळला.

बापाला मुलीच्या भविष्याशी काहीही देणं घेणं नव्हतं. पण आई काय म्हणते, याकडे गिताचे डोळे लागले होते... तिला आईकडून आशा होती, पण ती माऊली तरी काय करणार होती. तिच्या आईनेही गिताच्या लग्नाला होकार कळवून टाकला.
तिच्या आईने तिचं लग्न ठरवताना हा विचार केला की जर तिचं लग्न झालं तर ती तिच्या घरी सुखात राहील. इथे घरी राहून तरी काय करणार... तिच्या पुढील शिक्षणासाठी सुध्दा तिची आई काही करू शकत नव्हती. गिताला सगळ्या कामांचा उरक होता. घरातली सगळी कामं करताना गिताचा हात भार लागत होता... हे तिच्या आईला ठाऊक होतं.

गिताचं लग्न झालं...
हसण्या खिदळण्याच्या, हौसे-मौजेच्या आनंदाने बहरण्याच्या वयात पुन्हा ती चार भिंतीच्या आत कोंडली गेली. फक्त यावेळेस ठिकाण बदललं होतं. पण यातना त्याच होत्या... गिताने आपल्या भळभळत्या जखमेवर स्वतःहुन फुंकर घातली. आणि नव्या अग्निदिव्याला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाली...
कणखर बनली. धाडसी बनली.
लग्न लागलं तेव्हा नवऱ्याला नोकरी नव्हती. त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं होतं. त्याने त्यानंतर खूप ठिकाणी प्रयत्न करूनही त्याला कुठे नोकरी मिळत नव्हती. म्हणून सासूने असा विचार केला की आपल्या मोठया मुलाला आणि सुनेला गावीच ठेवलं तर गावचं घर बंद राहणार नाही. घराची सगळी जबाबदारी गिता सांभाळेल. कारण ती गावातच लहानाची मोठी झालेली आहे. गिताला एव्हाना सारं काही समजलं होतं, आपल्याला कुठल्या खडतर मार्गावरून जावं लागणार याची तिला कल्पना आली. तिने एके दिवशी विचारपूर्वक नवऱ्याला सांगितलं की, मी इथे गावी राहून शेती करेन. तुम्ही मुंबईला जाऊन नोकरी करा. तुमचा जन्म मुंबईतला, तुम्हाला शेतीच्या कामांची गती नाही, त्यापेक्षा तुम्ही मुंबईला जाऊन प्रयत्न करून नोकरी मिळवली तर आपल्या मुलांचं भविष्य सुकर होईल. नवऱ्याने गिताचं ऐकलं.

नवरा मुंबईला गेला, त्याला नोकरी मिळाली पण हा आनंद गिता फार काळ अनुभवू शकली नाही. कारण गिता गावी रहायची आणि नवरा मुंबईला. गिताने गावात आपल्या कष्टाने नवं विश्व उभं केलं, पण शहरात गेलेवा नवरा मात्र दारू पिऊ लागला... ज्या गिताने लहानपणी आपल्या वडलांना आणि भावाला दारू पिताना पाहिलं. नंतर त्या दोघांवर ओढवलेला मृत्यू पाहिला होता. त्यामुळे नवऱ्याच्या काळजीने ती दिवसेंदिवस चिंतेत राहू लागली. नवरा अधूनमधून गावी येई...

आपल्या दोन मुलांना घेऊन गिता एकटी गावच्या घरात राहत होती. शेतीची सारी कामे करत होती. प्रत्येक गोष्टीत कष्ट उपसण्याची तिची तयारी होती. आपलं प्राक्तन गितानं मोठ्या मनानं स्वीकारलं. कारण आपल्या वाट्याला आलेल्या आयुष्यात तिच बदल घडवून आणू शकेल, असा विश्वास गिताला होता. याच विश्वासानं घरच नाही तर अख्खं गावं आपलंसं केलं. तिने स्वतःचा संसार सावरला.
सोबत कित्येकींना जगण्याचं बळ दिलं. गावगुंडाशी खंबीरपणे लढली. तिच्या विवेकबुद्धीने ती त्यांनाही पुरून उरली. काही क्षण कोमेजली, अडखळली
काही क्षण निमूट बसली, शांत राहिलीकाही क्षण तिने असंबद्ध टाहो फोडला
तरीही पुन्हा स्वतःला आणि संसाराला सावरलं. तिच्या चेहेऱ्यावरील कधीही न मावळणारं हास्य, हीच तिच्या विरोधकांची हार... अशी ही कणखर स्त्री. मला विविध रूपात भेटणारी... मनस्विनी ही माझ्या प्रेरणेचा अखंड स्त्रोत आहे.
सध्या लोक तिला मानसिक रुग्ण म्हणतात, पण मला वाटतं ती मानसिक रुग्ण नाहीय. कारण विवेकाने वागणाऱ्या प्रत्येकाला हल्ली वेडा म्हणण्याची फॅशन झालीय...
क्रमशः


(मनस्विनीच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध टप्पे विस्तृतपणे पुढील लेखात येतील लवकरच)



Wednesday, 22 July 2015

जोडीदार

ओळखीच्या माणसांचा
भोवती माझ्या पसारा
पण मला वाटतो हा
देखाव्याचा खेळ सारा

एकटेपण सोसून झाले
भावनेला शब्द गवसले
पण बोलताना मनासारखे
आसवांचे मेघ झाले

माझे रितेपण शोधते
सोबतीस एक साथी
स्वप्नांच्या गावातही
तो अजून अनोळखी

अनोळखी या वाटेवरती
चालते पुन्हा पुन्हा
प्रश्न सारे कोंडले
उत्तराला आसुसले
एका 'ती'ची ही आर्त साद. ती आयुष्याला खूप कंटाळली होती. ऑफिसमध्ये सारं काही ठिक होतं. पण तिच्या खाजगी आयुष्यात दिवसेंदिवस प्रचंड उलथापालथ होत होती. ऑफिसमधून घरी आल्यानंतरचा प्रत्येक क्षण तिची परीक्षाच घेत असे. तिचं लग्नाचं वय झालं होतं. तरी तिचं लग्न जमत नव्हतं. निर्बुद्ध समाज तिला नाही नाही ती लेबलं लावून मोकळा झाला होता. "वय वर्ष २८ आहे माझं. मी काही म्हातारी नाही झाले. काय कमी आहे माझ्यात? " ती स्वतःलाच प्रश्न विचारून समजावण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होती.

अलिकडे तिला कुठेच बाहेर जाऊ नये असं वाटे. सगळ्यांच्या नजरा आपल्यावरच आहेत, असं तिला वाटे.  पण इथे मुंबईत रहायला आल्यापासून तिने एक गोष्ट मात्र कधीच चुकवली नाही ती म्हणजे महालक्ष्मीच्या मंदिरात जाणं. ती काही धार्मिक व्रतवैकल्यात गुरफटलेली मुलगी नव्हती. काळाच्या बरोबर चालणारी होती. पण तिला देवीच्या मंदिरांमध्ये जायला आवडे. त्यातूनही महालक्ष्मीच्या मंदिरात जायला विशेष आवडे. मंदिर तिच्या घरापासून जवळच होतं. ती सहज तिथे चालत जाऊ शकत असे. जवळपास २५ मिनिटं लागायची. तिला जेव्हा केव्हा मनापासून मंदिरात जावंसं वाटे तेव्हा ती आवर्जून जाई. पण मंदिरात जाण्याचे दोन खास दिवस तिचे ठरलेले होते. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी आणि ३१ डिसेंबरला ती न चुकता मंदिरात जायची. तिला मंदिरात गेल्यावर खूप प्रसन्न वाटायचं. आपल्या मनातल्या साऱ्या इच्छा, आकांक्षा ती घडाघडा देवीसमोर बोलून मोकळी व्हायची. आपल्या अश्रूंना न आवरता डोळ्यातून वाहू द्यायची. सकाळच्या वेळी पायी चालत मंदिरात जाणं, तिला खूप आवडायचं. "सकाळचीच वेळ मंदिरात येण्यासाठी उत्तम! " असं तिने ठरवूनच टाकलं होतं.
एके दिवशी घरी लग्नाच्या बाबतीत घडलेल्या प्रकाराने ती खूप दुखावली गेली होती. तिने अख्खी रात्र रडून घालवली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती महालक्ष्मीच्या मंदिरात गेली. "इतकी मानहानी सोसत आपण का बरं जगायचं?" याचा जाब विचारायला ती देवीसमोर हात जोडून उभी राहिली. "आता जोवर माझं लग्न होत नाही. तोपर्यंत तुझ्या मंदिरात पाऊल टाकणार नाही. मी एकटी नसेन, माझा जोडीदारही माझ्यासोबत असेल. तेव्हाच तुझ्या मंदिराची पायरी चढेन. आता माझ्या लग्नाची काळजी मी नाही, तू करायचीस." देवीशी भांडून, तिला आव्हान देतच ती मंदिरातून बाहेर पडली.

दोन वर्षं उलटून गेली. तिचं लग्न झालं नाही. ती खूप चिडचिडी झाली होती. पण स्वतःलाच दोष देणं तिने बंद केलं होतं. तिला आता काहीही झालं तरी ताठ मानेनं जगाचयं होतं. समाजाचं बोलणं फारसं मनाला लावून घ्यायचं नाही, असं तिने ठरवलं होतं. ती कामात स्वतःला गुंतून घेऊ लागली. मग एके दिवशी खूप मनापासून मंदिरात जावंसं वाटलं. पण तिला आठवलं, आपण त्या दिवशी मंदिरात काय बोलून आलो होतो ते. "पण जाऊ दे ना काय हरकत आहे. मी मंदिरात एकटी गेले तर. मी देवीला नवस बोलले नव्हते. माझ्या मनातली एक वेडी भावना देवीसमोर बोलून बिनधास्त झाले होते. तो फक्त एक संवाद होता, माझ्या मनातील भावनांवर त्या दिवशी नियंत्रण ठेवू शकले नव्हते. एवढंच ते... त्यात काय एवढं कठोरपणे पाळायचं. मी आज जाणारच एकटी देवीच्या मंदिरात, बघू काय होतं ते. संध्याकाळी सोसायटीत थर्टी फर्स्टच्या पार्टीची तयारी सुरू होईल. मी नेहमी जाते तशी सकाळीच मंदिरात जाऊन येते." असं स्वतःशीच बोलून ती निघाली. मनात खूप विचार येत होते. खरंच अशी काही जादू घडली असती दोन वर्षात आणि मी माझ्या जोडीदारासोबतच मंदिरात आले असते तर... तिला या विचाराचं हसू आलं.
ये सब बातें फिल्मों में ठिक हैं, रियल लाईफ में ऐसा कुछ नही होता तिने आपल्या मनाला समजावलं. मंदिराचा कळस दिसू लागला. पुढच्या ५ मिनिटात ती मंदिराच्या प्रवेश दारापाशी पोहोचली. तिच्या मनात खळबळ माजली होती. चेहरा घामाघुम झाला होता. पायऱ्या चढताना तिला जाणवत होतं की ती एकटी नाहीय. कुणीतरी तिच्या सोबत चालतंय. पण तिने मागे वळून पाहिलं नाही. तिने ओटीचं ताट घेतलं.. झुळझुळती पिवळी ओढणी डोक्यावरून घेतली. पुजाऱ्याकडे ओटीचं ताट दिलं. तिने डोळे मिटले. "देवी मला माफ कर. माझी चूक झाली. मी त्या दिवशी काहीतरी वेड्यासारखं बरळून गेले. वाटलं होतं लवकरच माझी ती इच्छा पूर्ण होईल. आणि धावत तुझ्या दर्शनाला माझ्या जोडीदारासोबत येईन. पण असं झालं नाही. शेवटी ती मंदिरात न येण्याची स्वतःहून मलाच घातलेली अट मी मोडून काढली." पुढे ती बोलणार होती तितक्यात तिचा तोल गेला. ती खाली कोसळणार तोच तिला मागून कुणीतरी सावरलं. ती त्याच्या आधाराने उभी राहिली. पुजाऱ्याने ताट दिलं, घेण्यासाठी त्या दोघांनीही हात पुढे केला. पुजाऱ्याने दोघांना आशिर्वाद दिला. पुजाऱ्याच्या शब्दांनी ती भानावर आली. तिने आपल्या बाजूला वळून पाहिलं. एक तरुण मुलगा तिच्याकडेच पाहत उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी गवसल्याचं समाधान झळकत होतं. ती चालू लागली. तोही तिच्या मागोमाग चालू लागला. तिला जाणवलं कुणीतरी आपल्यामागे येत आहे. ती मागे वळली. तिने त्या मुलाचे आभार मानले आणि पुन्हा चालू लागली. तेवढ्यात तो म्हणाला, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. आपण थोडं इथं बसूयात का?  तिलाही थकवा जाणवत होता. एवढ्याश्या चालण्याने ती कधी थकत नाही. पण कितीही संकटं आली तरी मी खंबीर आहे, असा मुखवटा जो गेली दोन वर्षं तिने चढवला होता. आज देवीसमोर हात जोडल्यावर तो मुखवटा गळून पडला होता. त्यामुळेच तिचा तोल गेला होता.
ती दोघंही बसली. तो बोलू लागला. "तुम्ही मला ओळखत नाही. पण मी तुम्हाला ओळखतो. दोन वर्षांपूर्वी सकाळच्या वेळी मी मंदिरात आलो होतो. त्या दिवशी मी पहिल्यांदा तुम्हाला मंदिरात पाहिलं. आणि मी तुम्हाला पाहताक्षणी तुमच्या प्रेमात पडलो. मला त्याच दिवशी तुमच्याशी बोलायचं होतं. तुम्ही मंदिरातून जाऊ लागलात तेव्हा मीही तुमच्या मागोमाग निघालो. पण आपल्या दोघांमध्ये खूप अंतर होतं. मी तुम्हाला हाकही मारू शकत नव्हतो. तितक्यात सिग्नल संपलं. नी गाड्या सुरू झाल्या. तुम्ही सिग्नलच्या पलिकडे निघून गेलात. पण तुमच्यामागे धावताना माझं सिग्नलकडे लक्षच नव्हतं. एका गाडीने मला धडक दिली. माझ्या दोन्ही पायांना खूप लागलं. गेली दोन वर्षं मी व्हिलचेअरवर होतो. पण गेली दोन वर्षं मी कशी काढली माझं मलाच ठाऊक. तुमचं नाव माहीत नाही. तुम्ही कुठं राहता हे माहीत नाही. मग कसा शोध घेणार होतो मी तुमचा. तुमचा चेहरा नजरेसमोरून हटत नव्हता. गेल्याच आठवड्यापासून कसल्याही आधाराशिवाय चालण्याचा प्रयत्न करतोय. आज सकाळी उठलो तेव्हा पायांमध्ये ताकद जाणवली आणि दोन पायांवर धड उभा राहू शकलो. उभा राहिलो तेव्हा पुन्हा नजरेसमोर तुमचा चेहरा आला नी मंदिरात यायचं ठरवलं. तुम्हाला भेटल्यावर आता कळतंय की माझ्या मनाने का ध्यास घेतला होता मंदिरात येण्याचा. माझ्या प्रेमाचा स्वीकार करा. मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही.
आतापर्यंत ती स्वप्नातच आपल्याला जोडीदाराला विनवणी करत होती. "किती छळतं हे एकाकीपण
एकदाचबस एकदाच तरी तू,  खराखुरा ये ना…" आणि आज तो तिच्या आयुष्यात खराखुरा आला होता.
               

दोघांच्याही डोळ्यात पाणी होतं. नजरेतूनच दोघांनी परस्परांचा स्वीकार केला. देवीसमोर पुन्हा एकदा दोघांनी मनोभावे हात जोडले. ती दोन मने आज एक होऊन तृप्त झाली होती. मंदिरातून घरी जाताना ती आता एकटी नव्हती. तिच्यासोबत तिच्या जिवाभावाचा जोडीदार होता.  

तो, ती आणि छत्री

ती एक स्वप्नाळू मुलगी होती. तिला पाऊस खूप आवडायचा. आभाळ भरून आलं की तिला खूप आनंद व्हायचा. मग ती आभाळाकडे बघत टाळ्या वाजवायची. तिच्यासाठी पाऊस म्हणजे जिवाभावाचा सखा!!!
पावसाळा हा तिचा आवडता ऋतू ती एखाद्या सणासारखा साजरा करायची. रोज उंबऱ्यावर बसून पावसाची वाट पाहायची. पावसाच्या रिमझिम सरी बरसू लागल्या की भान हरपून पावसात मनसोक्त भिजायची. तिच्या बालपणापासून तिने पावसाच्या सोबतीने अनेक मोहक क्षण अनुभवले होते. ते सारे अनुभव तिने ह्रदयाच्या कप्प्यात जिवापाड जपले होते.
गावचा पाऊस म्हणजे निसर्गाची अनोखी किमया होती. इथे शहरात आल्यापासून आता फक्त तिला आठवणीतल्या पावसाची सोबत होती. पण एके दिवशी तिने ठरवलं, पाऊस शहरातला काय, गावाकडचा काय, एकच! फक्त ठिकाणं वेगवेगळी!
आपण इथल्या पावसातही मनसोक्त मजा करायची. आणि आभाळ भरून आलं. तिला उत्सुकता होती की शहरातले लोक पावसाचं स्वागत कसं करतात याची. पण तिची घोर निराशा झाली. पाऊस आल्याचं कुणाच्या चेहऱ्यावर समाधान नव्हतं. सगळे नेहमीच्या रहाटगाडग्यात बिझी होते. काही जणांना तिने समुद्रावर जाताना पाहिलं  तेही छत्री घेऊन.
तिही छत्री घेऊन बाहेर पडली. खरंतर तिला छत्री न घेता भिजत जायचं होतं. पण काय करणार! असं एकटंच वेड्यासारखं भिजत कसं जाणार? लोग क्या कहेंगे? हा विचार डोक्यात येऊन ती छत्री घेऊन बाहेर पडली.
तिने छत्री घेतली होती खरी पण ती छत्री मधे मधे तिरकी करून कधी कधी थोड्या वेळासाठी बाजूला करत ती पावसाच्या सरींचा स्पर्श अनुभवत होती. किनाऱ्यावर पोहोचली तेव्हा आनंदाच्या कारंजाने तिच्या मनात उसळी घेतली. किनारा किती आकर्षक दिसत होता. सागरातून उसळणारी प्रत्येक लाट काहीतरी निरोप किनाऱ्याला सांगून परतत होती.
मरीन ड्राईव्हच्या फुटपाथवर छत्री घेऊन रिमझिम सरींत एकटक समुद्राकडे पाहताना ती भान हरपून गेली. मनोमन म्हणत होती... "यावर्षीच्या पावसात मी एकटीच भिजते आहे... ठिक आहे... पण पुढच्या वर्षीच्या पावसात माझ्यासोबत भिजायला तोही असेल. मी एकटी नसेन... मी एकटी नसेन... पाऊस पडायला लागला की मी लहान मूल होऊन जाते आणि वाटत राहतं माझ्यासोबत कुणीतरी असायला हवं... जिवाभावाचं... एकाच छत्रीतून त्याच्यासोबत चालण्याचा क्षण माझ्या आयुष्यात कधी येईल का?"
ती एकटी चिंब भिजलेला समुद्रकिनारा पाहताना कुणाचीतरी सोबत मागत होती. गावातून शहरात आल्यावर ती खूप एकटी पडली होती. हॉस्टेलमधल्या मुलींशी तिची फारशी मैत्री झाली नव्हती. तिच्या छत्रीवर, फुटपाथवर, समुद्रकिनाऱ्यावर पाऊस बेधुंद बरसत होता. तसाच तिच्या मनाच्या आभाळतल्या पावसानेही आत दाटी केली होती. फक्त तिच्या पापण्याआडून बरसायचा बाकी होता. आणि पुढे घडणाऱ्या भयानक प्रसंगाची तिने कल्पनाच केली नव्हती.
पावसामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. म्हणून चार बाईकस्वार तरुण फुटपाथवरून रोरावत चालले होते. त्यातल्या एकाने तिला जोरात धडक दिली.
पाऊस आल्यामुळे आनंदित झालेली ती क्षणार्धात फुटपाथवर कोसळली. कुणीच तिच्या मदतीला धावलं नाही. जो तो दुर्लक्ष करत, फक्त हळहळ व्यक्त करत पुढे निघून जात होता. अखेर त्या गर्दीतून एक तरुण मुलगा पुढे आला. त्याने तिला उचललं. ती बेशुद्ध अवस्थेत होती. हॉस्पीटलमध्ये पोहोचेपर्यंत मेंदूतून खूप रक्तस्त्राव झाला होता. दोन दिवसांनी ती शुद्धीवर आली. तिच्या आजूबाजूला कोणीच नव्हतं.
थोड्या वेळाने डॉक्टर आले. तिने डॉक्टरांना विचारलं, ... मी इथे कशी?
डॉक्टरांनी तिला सांगितलं... "शांत व्हा... तुमचा अपघात झाला होता. तो मुलगा तुम्हाला इथे घेऊन आला." डॉक्टरांनी पॅसेजमध्ये बसलेल्या मुलाकडे हात दाखवला.
तो मुलगा उठून तिच्याजवळ आला. तिने विचारलं, ... 'तुम्ही कोण?'
तो म्हणाला, "ते जाऊ देत... आधी मला सांगा तुमच्या घरी कोण कोण असतं?"
तुम्ही कुठे राहता?
तुमचे नातेवाईक... तुमचं नाव?
तुम्हाला इथे आणलं तेव्हा तुमची ओळख पटावी असं तुमच्याकडे काहीच नव्हतं. फुटपाथवर तुमच्या बाजूला फक्त एक छत्री पडली होती.
तिने मेंदूवर जोर दिला. आठवायचा प्रयत्न केला. पण तिला काहीच आठवेना.
डॉक्टर म्हणाले, ... "काळजी करू नका. आठवेल तुम्हाला हळूहळू... ताण घेऊ नका... थोडा वेळ शांत पडून रहा..."
ती स्वप्नाळू मुलगी आपली ओळख कायमची विसरून गेली होती. घरच्यांशी संपर्क साधण्याचं काहीच साधन हाती उरलं नव्हतं. त्याने मात्र तिला अंतर दिलं नाही. तिला पूर्ण बरं वाटल्यावर तो तिला आपल्या घरी घेऊन गेला. वर्षभराच्या सहवासाने दोघे मनाने खूप जवळ आले होते. ती आपली ओळख त्याच्या डोळ्यात शोधत होती. आपलं सारं जग ती त्याच्याच डोळ्यात पाहत होती. दोघांनी लग्न केलं.

आता ते आठवड्यातून दोनदा तरी मरीन ड्राईव्हला येतात. आणि पावसात भिजायला तर एकाच छत्रीतून आवर्जून ती दोघं मरीन ड्राईव्हला येतात. ती लहान मूल होऊन त्याच्यासोबत सरींचा स्पर्श मनसोक्त अनुभवते. त्याला वाटतं,  तिला इथे आणलं तर काहीतरी आठवेल. तिच्या कुणीतरी ओळखीचं भेटेल. पण पुढच्याच क्षणी तो प्रचंड घाबरूनही जातो. "तिच्या ओळखीचं कुणी भेटलं नी तिला माझ्यापासून कायमचं दूर घेऊन गेलं तर..." कारण आता तिच्याशिवाय आपल्या आयुष्याची तो कल्पनाच करू शकत नाही...


पूर्वप्रसिध्दी - १७ जुलै २०१५, साप्ताहिक लोकप्रभा

Tuesday, 14 April 2015

स्मारकांचा अट्टाहास कशासाठी?

चाळीतल्या ऐनापुरे मामांचं नुकतच निधन झालं होतं. नेहमी गडबड गोंगाट असणाऱ्या चाळीत शांतता पसरली होती. पण ती काही दिवसांचीच पाहुणी असणार होती... पुन्हा झालं गेलं विसरून चाळीचं वातावरण पुन्हा निवळणार होतं. पण बरेच दिवस लोटले, ऐनापुरे मामांना जाऊन... धार्मिक विधीही पार पडले होते. तरी चाळीतलं वातावरण काही पूर्वपदार येईना. मामांचा चाळीवर, चाळीतल्या माणसांवर खूप जीव होता. आणि चाळीतल्या मोठ्या माणसांपासून ते लहानग्यांपर्यंत सर्वांना मामांचा लळा होता.
एके दिवशी दुपारच्या जेवणानंतर चाळीतली काही मंडळी चाळीसमोरच्या छोटेखानी आवारात बसली होती. त्यातल्या एकाने विषय काढला, "खूप दिवस झाले मामांना जाऊन.  त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे. ती काही केल्या भरून निघत नाही." इतक्यात दुसरा एकजण म्हणाला,  "आपण ऐनापुरे मामांची समाधी बांधूया."  त्याच्या अशा बोलण्याने चाळीसमोरच्या आवारातील अस्ताव्यस्त घोळका गंभीर झाला. त्या घोळक्यातील एक-दोन टाळकी थोडंसं हसलीही होती. 'समाधी' हा शब्द ऐकून. मग बरंच विचारमंथन झालं. पण समाधी बांधण्याच्या निर्णयाप्रत कुणीही येईना. आठवडाभर यावर उलट-सुलट चर्चा सुरू होती. आणि या चर्चेने पार खालची पातळी गाठली होती. ऐनापुरे मामांच्या स्मृती राहिल्या बाजुलाच. हे असंच होत आहे हल्ली. समाधी किंवा स्मारक बांधण्यामागचा उदात्त हेतू आपण विसरत चाललो आहोत. आणि समाधी, स्मारक यावर विचार (?) करण्यात नाहक शक्ती खर्च करतो आहोत.
खरे पाहता याची काही एक आवश्यकता नाही. कारण हे सारे रिकामटेकडेपणाचे उद्योग आहेत. हे सद्यस्थितीच्या स्मारकांच्या चाललेल्या वादांवरून वाटतं.  असं म्हणतात की माणूस रिकामपणाचा वेळ कसा घालवतो. यावर त्याची संस्कृती अवलंबून असते. या मताचा विचार केला तर असं दिसून येईल की आता समाजात पुतळा, स्मारकांची संस्कृती मूळ धरू पाहत आहे.
मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ आणि प्रसिद्ध लेखिका इरावती कर्वे यांनी त्यांच्या परिपूर्ती या लेखसंग्रहातील बीज-क्षेत्र या लेखात एक विधान केलं होतं की "समाजात  नैसर्गिक घटनांपेक्षा सामाजिक संकेतांनाच जास्त प्राधान्य असते. इतकेच नाही तर नैसर्गिक घटनांचा उपयोग सामाजिक संकेताना बळकटी आणण्यासाठी होतो. "


आजचे पुतळ्यांचे राजकारण पाहता हे विधान आजच्या परिस्थितीला चपखलपणे लागू होते. सामान्य व्यक्ती असो वा एखादी महान व्यक्ती असो. मृत पावल्यानंतर तिचा अंत्यविधी होईपर्यंत घडणारी प्रत्येक घटना नैसर्गिक असते. पण एकदा का अंत्यविधी पार पडला की नंतर अस्थी विसर्जन, श्राद्धविधी ते अगदी पुतळा किंवा स्मारक होण्याची जी प्रक्रिया सुरू होते ती सामाजिक संकेतांमुळेच. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय?  तर त्याचं उत्तर असं आहे की मृत व्यक्तीच्या अस्थी विसर्जन कुठे करतो तर व्यक्तीच्या घरचे लोक गरीब असतील तर जवळपासच्या समुद्रात आणि श्रीमंत असतील तर नाशिक, काशी अशी अस्थिविसर्जनाच्या ठिकाणांची यादी वाढत जाते. मग श्राद्धविधी तोसुद्धा ऐपतीप्रमाणे होत असतो. आणि नंतर पुतळा किंवा स्मारकाचा विचार.


मला वाटतं, पुतळा आणि स्मारकाचा विचार हा पूर्णपणे भावनिक पातळीवर होत असतो. कारण भारतीय मनोविचारांचा पक्षी भावनेचे पंख लावून उडत असतो. अलिकडचे राजकारण पाहता भावनिक आवाहनांना जोर आल्याचं दिसतं आहे. पुतळे आणि स्मारकाबद्दल आपण कसे भावूक होतो याचं उदाहरण द्यायचं झालं तर 'अजिंठा' हा नितीन देसाई यांचा चित्रपट. या चित्रपटातील शेवटच्या दृश्यात मेजर रॉबर्ट गीलला हे कळतं की पारो आता या जगात नाही. ती आपल्याला कायमची सोडून गेली आहे. त्याला खूप दुःख होतं. दुःखाच्या आवेगाने तो कोसळतो. नंतर तो समाधीसमोर नतमस्तक होताना चित्रपटात दाखवले आहे. हे दृश्य इतकं परिणामकारक आहे की पाहताना वाटतं, रॉबर्ट गीलचा सारा दुःखावेग, भावनांचा कल्लोळ त्या समाधीत बंदिस्त झाला आहे आणि गिलसाहेब मनातून थोडे शांत झालेले दिसतात.
गजमल माळी यांच्या 'कल्पद्रुमाची डहाळी' या नाटकाच्या मनोगतात लिहिल्याप्रमाणे मेजर रॉबर्ट गील यांनी ज्या टेकडीवर बंगला बांधला होता. त्याच आवारात पारोची समाधी आहे. आणि गिलसाहेबांची समाधी चर्चयार्ड भुसावळ येथे आहे. पारो आणि गिलचं उत्कट प्रेम आणि निष्ठा  येणाऱ्या पिढीला कळावी म्हणून या दोन्हीही समाधींचं अनन्यसाधारण महत्त्व आहे.
भारतात अशा अनेक पुरातन समाधी, स्मारके आहेत ज्यांना आपल्या भावनिक दृष्टिकोनातून अधिक महत्त्व आहे. एखादी व्यक्ती किंवा महनीय व्यक्ती यांच्या जाण्याने आपल्या आयुष्यात जी कमतरता निर्माण होत असते. ती भरून काढण्यासाठी आपण काही मार्ग शोधत असतो. समाधीचा विचार त्यापैकीच एक.


प्रसिद्ध मानसशास्त्र तज्ज्ञ जॉन ग्रे यांनी त्यांच्या मार्स-व्हीनस मालिकेतील 'मार्स अँड व्हीनस स्टार्टींग ओव्हर' या पुस्तकात आपल्या आयुष्यातून निघून गेलेल्या व्यक्तींच्या स्मृतीसाठी, आपले भावनिक समाधान व्हावं, यासाठी काही उपाय सांगितले आहेत. ते असे... स्मृतीमध्ये एखादं झाड किंवा विशेष रोपटं तुमच्या प्रिय व्यक्तीच्या आठवणीत लावा. आणि त्याचं संगोपन करा. तुमच्या बागेचा एक कोपरा तिच्या/त्याच्या नावे अर्पण करा. तुमच्या प्रिय व्यक्तीची कशावर श्रद्धा होती ते आठवा. तेथे काही तिच्या नावे देणगी द्या आणि शक्य झाले तर, जर ते सार्वजनिक ठिकाण असेल तर एखादे छोटेसे स्मृतिचिन्ह तिचं नाव कोरून बसवा. हे सारे उपाय विधायक आहेत. कारण त्या व्यक्तीबद्दलची आस्था त्यात आहे.
एखादी महान व्यक्ती मृत पावली तर तिचे अंत्यविधी केले त्याच जागी त्याची समाधी अथवा स्मारक व्हावं का?  एखाद्या जागेला त्या व्यक्तीचे नाव द्यावे का? सार्वजनिक ठिकाणी तिचं स्मारक बांधावं का? अशा प्रश्नांना धार्मिक आधार नसून भावनिक अधिष्ठानच अधिक असल्याचं दिसतं. हिंदू धर्माच्या संकल्पनेत श्राद्ध विधीला भव्य, दिव्य असं स्थान आहे. मृत व्यक्तीसाठी ह्यात व्यक्तींनी केलेल्या क्रिया म्हणजे श्राद्ध असा समज सर्वत्र रूढ झालेला आहे. परंतु 'शास्त्र असे सांगते' या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे, "प्राचीन सुरींनी श्राद्धकर्माची अमर्याद व्याप्ती लक्षात घेऊनच संपूर्ण मानवी जीवन श्रद्धामय करण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला दिसून येतो. त्यास अनुसरून व्यक्तीचे निधन झाल्यावरच नव्हे तर ती व्यक्ती ह्यात असतानाच तिच्याशी मायेने व प्रेमाने एकरूप होऊन तिच्या उन्नतीसाठी व उत्क्रांतीसाठी आपल्याकडून होतील तितके प्रयत्न करणे हेदेखील एक प्रकारचे श्राद्धच होय. श्राद्धाची ही उत्तुंग व उदात्त संकल्पना ह्रदयाशी भिडल्यावर हातून होणारी प्रत्येक क्रिया म्हणजे श्राद्ध ठरते."

माझ्या या अल्पवाचनावरून मला वाटतं की आपली श्राद्धाची संकल्पना इतकी भव्य, दिव्य आहे तर स्मारक, समाधीची गरज का भासते?  तर यामागे दडलेला असतो, सामाजिक संकेत आणि दिखाऊगिरी. कारण परदेशी लोकांप्रमाणे आपला स्मारकांकडे पाहण्याचा कलात्मक दृष्टिकोन नसतोच आणि मृत व्यक्तीच्या चांगल्या विचारांना आत्मसात करण्याचा मोठेपणा आपण दाखवत नाही. हिंदू धर्मात अस्थी निषिद्ध असल्याने आपण अस्थी विसर्जन करतो. आणि दहन झाले ती जागा अपवित्र होऊ नये म्हणून प्राचीन काळापासून काळजी घेतल्याचं दिसून येतं. म्हणून त्या ठिकाणी मठ, मंदिर, समाधी उभी राहते. किंवा दहन झाले त्या जागेवरील पाषाण (दगड) आणून घराजवळील आवारात समाधी बांधली जाते. पण आता या प्रक्रियेला दिखाऊ स्वरूप आल्याने वादंग निर्माण होतात.
मृत पावलेली महान व्यक्ती सदैव स्मरणात रहावी, तिचं स्मारक व्हावं ही भावना रास्त आहे. पण याचा अतिरेक वाईट. ती महान व्यक्ती आपल्या विचारांनी आणि आपल्या असण्याने समाजाला अमूल्य असा वैचारिक ठेवा देऊन जाते. तो ठेवा आपण आचरणातून जतन करून ठेवायला हवा. प्रसिद्ध मानसशास्त्र तज्ज्ञ जॉन ग्रे यांनीच म्हटल्याप्रमाणे मृत व्यक्तीला आठवताना त्या व्यक्तीने केलेल्या चांगल्या गोष्टी आठवा. तसेच दैनंदिन आयुष्यात त्यांचे नेहमी स्मरण करा. त्यासाठी त्यांचे पुतळे, स्मारक उभारण्याची काहीच आवश्यकता नाही. शहरांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे जागेची समस्या भेडसावत आहे. पुतळे आणि स्मारके उभारण्याच्या जागी सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील अशी घरं उपलब्ध करून दिली तर ही खरी विधायक गोष्ट ठरेल.
स्वतःच्या महत्त्वकांक्षेसाठी आणि टेंभा मिरवण्यासाठी ज्यांनी स्मारकांचे मुद्दे उपस्थित करून सध्या जो काही बाजार मांडलाय, त्याकडे सर्वसामान्य माणसाने दुर्लक्ष केलेलंच बरं. उगाच त्या मुद्द्याशी आपल्या भावना जोडून स्वतः तोंडघशी का पडायचंजोपर्यंत महात्म्यांच्या विचाराचं अमृत आपण आपल्या आचरणातून शरीराच्या नसानसातून भिनवत नाही. तोपर्यंत स्मारकांचा हा अट्टाहास न केलेला बरा!!!!


अरबी समुद्रात शिव स्मारक बांधण्याचा वाद सुरूच आहे.

आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...